राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इष्रे समितीची स्थापना ....
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागामध्ये इष्रे (इंडिअन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडीशनिंग इंजिनिअर्स) समितीची तिसऱ्या वर्षीसाठी स्थापना करण्यात आली.
इष्रेची स्थापना १९८१ मध्ये नवी दिल्ली येथे प्रख्यात एचव्हीएसी व्यावसायिकांच्या गटाने केली. आज इष्रेमध्ये ३०, ००० पेक्षा जास्त एचव्हीएसी व्यावसायिक आणि विद्यार्थी-सदस्य आहेत. दिल्लीमध्ये मुख्यालय असलेल्या इष्रे संपूर्ण भारतभर पसरलेल्या ४१ समिती आणि उप समित्यांमधून कार्यरत आहे. या संघटनेचे नेतृत्व सोसायटीचे सदस्य असणा-या निवडक अधिकाऱ्यामार्फत केले जाते. हीटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडीशनिंग आणि रेफ्रिजरेशन अभियांत्रिकी आणि संबंधित सेवांच्या कला आणि विज्ञानातील प्रगती, व्याख्याने, कार्यशाळा, उत्पादन सादरीकरणे, प्रकाशने व प्रदर्शने यांच्याद्वारे सदर विज्ञानातील सदस्यांचे व इतर इच्छुक व्यक्तींचे निरंतर शिक्षण, त्या विज्ञानातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाची आणि आर्थिक मदतीची व्याख्या, वैज्ञानिक संशोधनास प्रोत्साहन हि इष्रेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाची सरस्वती पूजन व राष्ट्रगीत गायनाने सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. महेश भागवत, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. सचिन वाघमारे, इष्रेचे ठाणे विभागप्रमुख सागर मुनीश्वर, स्थापना अधिकारी निवेदिता जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सचिन वाघमारे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी इष्रेच्या कार्याची प्रशंसा करून विद्यार्थी सभासदांनी समितीमध्ये सक्रियपणे भाग घेऊन इष्रे मार्फत होणाऱ्या कार्यक्रमांचा आपल्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा असे आवाहन केले. महाविद्यालयाचा विद्यार्थी ओंकार सुर्वे याने प्रेसेन्टेशनच्या माध्यमातून मागील तीन वर्षातील उपक्रमांची माहिती दिली.
यानंतर सागर मुनीश्वर यांनी इष्रेबद्दल सखोल माहिती देताना समिती स्थापनेचा मुख्य उद्देश स्पष्ट केला व विद्यार्थ्यांनी या समितीचे जास्तीतजास्त सभासदत्व घ्यावे असे आवाहन केले. निवेदिता जाधव यांच्या हस्ते विद्यार्थी सभासदांचा शपथविधी सोहळा पार पडला व त्यांनी या महाविद्यालयात औपचारिक पद्धतीने समितीची स्थापना झाल्याचे जाहीर केले. इष्रे समिती विद्यार्थी प्रमुख म्हणून महाविद्यालयाचा विद्यार्थी अनुप मेहेंदळे व इतर सदस्यांनी समितीसाठी शपथ घेतली. तर महाविद्यालयामध्ये इष्रे समितीचे सल्लागार म्हणून प्रा. वैभव डोंगरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
यानंतर श्री. मार्गेश गौडा, सहाय्यक महाव्यवस्थापक, डैकीन एअर कंडीशनिंग इं. प्रा. लि. मुंबई यांचा “ लेटेस्ट कॉम्प्रेसर टेक्नोलॉजी इन चिलर अॅप्ल्लीकेशन “ या विषयावर सेमिनार पार पडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रवण करकरे, अनुप मेहेंदळे, अद्वैत शेलटकर व इतर विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
संस्थेचे अध्यक्ष व माजी पालकमंत्री श्री. रविंद्रजी माने , कार्याध्यक्षा सौ. नेहा माने , श्री. प्रद्युम्न माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
फोटो १- कार्यक्रमासाठी उपस्थित इष्रे समितीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करताना मा. श्री. रविंद्रजी माने , कार्याध्यक्षा सौ. नेहा माने , श्री. प्रद्युम्न माने सोबत प्राचार्य डॉ. महेश भागवत, डॉ. सचिन वाघमारे, प्रा. वैभव डोंगरे इ.
फोटो 2- कार्यक्रम प्रसंगी उदघाटनपर भाषण करताना प्राचार्य डॉ. महेश भागवत, व्यासपीठावर इष्रेचे ठाणे विभागाचे पदाधिकारी तसेच डॉ. सचिन वाघमारे, प्रा. वैभव डोंगरे इ. इ.
फोटो 3- कार्यक्रमामध्ये इष्रेचे ठाणे विभागप्रमुख सागर मुनीश्वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, सोबत व्यासपीठावर प्राचार्य डॉ. महेश भागवत, इष्रेचे ठाणे विभागाचे अन्य पदाधिकारी तसेच डॉ. सचिन वाघमारे, प्रा. वैभव डोंगरे इ.
No comments:
Post a Comment