Wednesday, February 27, 2019

राजेंद्र माने एम एम एस मध्ये “एक्सप्लोअर – 2 के 19” महोत्सवाचे आयोजन

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने महाविद्यालयामधील एम.एम.एस विभागाचा
“एक्सप्लोअर – 2 के 19” हा वार्षिक युथ फेस्टिवल दिमाखात संपन्न झाला. रत्नागीरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
विविध पदवी महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बेस्ट परसोना स्पर्धा व जनरल चॅम्पियनशिप सारखी मुख्य आकर्षण असणा-या या दोन दिवसीय युथ फेस्टिवलमध्ये ट्रेझर हंट, बिझीनेस क्विझ, बिझिनेस प्लान, अॅडमॅड जुनून, बेस्ट आउट ऑफ वेस्ट, रंगोली, फोटोग्राफी यासारख्या विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या. दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ३२ महाविद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक श्री. रविंद्रजी माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व गद्रे मरीन रत्नागिरीचे एक्सपोर्ट सेल्स मॅनेजर मंदार भागवत, कोलते कॉम्पुटर रत्नागिरीचे संतोष कोलते, प्राचार्य डॉ.महेश भागवत, एम एम एस विभागप्रमुख प्रा. सुदर्शन जाधव, महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख तसेच विवध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीर येथे नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या
भारतीय जवानांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आली. यानंतर प्रथेप्रमाणे दीपप्रज्वलन तसेच मान्यवराचे स्वागत
करण्यात आले. एक्सप्लोअरचे संयोजक प्रा. सुदर्शन जाधव यांनी प्रास्ताविक करताना फेस्टिवल आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. तसेच विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवर व स्पर्धक विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानंतर महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना परिसरातील पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये विकसित व्हावीत व त्यांचा सर्वंकष विकास व्हावा यासाठी माने महाविद्यालयाने उचललेले हे एक पाउल असल्याचे सांगितले.
यानंतर संतोष कोलते म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाकडे पुढे स्वतः उद्योग उभारण्याच्या दृष्टीकोनातून
पहायला हवे. तसेच यासाठी संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व या दोन्ही बाबीही यासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत.प्रमुख पाहुणे मंदार भागवत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यवस्थापकिय शिक्षण व रोजगार यावर विशेष मार्गदर्शन केले.त्यांनी अशाप्रकारच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग फार महत्वाचा असल्याचे सांगितले.
माजी राज्यमंत्री श्री. रवींद्र माने यानी प्रथम सीमेवरील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी उद्योग धंद्यामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापकीय ज्ञान उपयुक्त असल्याचे सांगून इच्छाशक्ती,आत्मविश्वास, मेहनतीपणा यासारख्या गुणांकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे असे सांगितले.
यानंतर सलग दोन दिवस विविध प्रकारच्या स्पर्धा पार पडल्या. विशेषत्वाने दिव्यांच्या प्रकाशझोतात महाविद्यालयाच्या भव्य व हिरव्यागार प्रांगणात बेस्ट परसोना स्पर्धा रात्रीचे वातावरण धुंद करून गेली. कोकण फिल्म इंस्टीट्युट चिपळूणचे सत्येंद्र राजे आणि एल अॅड टी फायनान्स कोल्हापूरचे योगेश कुंभार यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. यामध्ये मिस्टर आणि मिस एक्सप्लोअर निवडण्यात आले. डीबीजेचा स्टीफन अलवी मिस्टर एक्सप्लोअर तर बाईंग कॉलेज लांजाची सविता पुजारी मिस एक्सप्लोअर ठरली.
प्रामुख्याने आठल्ये सप्रे महाविद्यालय देवरुख, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी, डी.बी.जे महाविद्यालय
चिपळूण, बी.एच.बाईग महाविद्यालय लांजा, , एस आर एम कॉलेज कुडाळ, डी एस जि कॉलेज सावंतवाडी, केळकर कॉलेज देवगड च्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवामध्ये आपली छांप पडली. स्पर्धेचा सांगता समारंभ गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या कॉमर्स विभाग उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
आपल्या भाषणात त्यानी अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाची गरज असून त्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला. सहभागी स्पर्धकांनीही या फेस्टिवलमधील सहभाग व महाविद्यालय परिसरातील दोन दिवस एक सुंदर अनुभव होता असे सांगितले. मा. रवींद्र माने, प्रद्युम्न माने, प्राचार्य डॉ महेश भागवत, विभागप्रमुख प्रा. सुदर्शन जाधव आणि मान्यवराच्या हस्ते विजेत्यां विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. देवरूखच्या आठल्ये सप्रे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विजेतेपदे मिळवत एक्सप्लोअर २ k १९ जनरल चॅम्पियनशिप पटकाविली.
ज्योत्स्ना यादव, पूर्वा पटेल, सुमित आम्रे यांनी सूत्रसंचालन केले. या संपूर्ण स्पर्धा महोत्सवाचे समन्वयक म्हणून प्रा.
मासुमा पागारकर यांनी काम पाहिले. तर नियोजनामध्ये एम एम एस विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी व इतर कर्मचा-यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

फोटो: १) मिस्टर आणि मिस एक्सप्लोअर आणि मान्यवर परीक्षक
२) विजेत्या महाविद्यालयाला “एक्सप्लोअर २ k १९ जनरल चॅम्पियनशिप” प्रदान करताना संस्थाध्यक्ष मा.
रवींद्र माने, प्रमुख पाहुण्या डॉ. यास्मिन आवटी, प्राचार्य डॉ. महेश भागवत.




राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात

आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी यामध्ये हिरीहीरीने सहभागी झाले होते.
यादिवशी पहाटे संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक या ठिकाणी स्वच्छता करून पूजा करण्यात आली. त्यानंतर याठिकाणी शिवज्योत प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराजाची पालखी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने आंबव येथील महाविद्यालाच्या प्रांगणात आणण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवज्योत व पालखी येताच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत व उपस्थितांनी विधिवत पूजन केले तसेच प्रवेश्द्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन केले. शिवचरित्र अभ्यासक प्रा. अरविंद कुलकर्णी यांचे यानंतर व्याख्यान झाले. शिवआरतीने व्याख्यानाला आरंभ करण्यात आला. प्रा कुलकर्णी यांनी “आजचा राष्ट्रवाद आणि शिवचरित्र” हा विषय घेऊन उपस्थितासमोर महाराजांचे जीवन व सध्ध्याचा राष्ट्रवाद यातील दुवा जोडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, शिवकालीन घटना या वास्तव असून आजही अचंबित करून जातात. त्यांचे चरित्र हे स्वधर्म, स्वदेशी व स्वभाषा या त्रिसूत्रीवर आधारलेले आढळते. महाराजांनी भारतामध्ये या तिन्ही गोष्टींचा सर्वप्रथम जागर केला. स्वधर्माचे उत्तम पालन व आचरण केले. स्वदेशीसाठी मोगल साम्राज्यामुळे उध्वस्त झालेल्या कारागिरांना पुन्हा प्रस्थापित केले. संगमेश्वरी गलबते, मजबुत किल्लेबांधणी यासारख्या गोष्टी त्याची आजही साक्ष देत आहेत. स्वभाषां जपण्यासाठी त्यांनी मराठीतून राज्यकोषही निर्माण केला. मात्र आजचा राष्ट्रवाद हा छत्रपतींच्या विचाराबरोबरच मोगल व ब्रिटीश साम्राज्य या सर्वांचे मिश्रण आहे. ते शेवटी म्हणाले कि, महाराजांच्या विचारातून अखंड जागरूकता, सावधानता, सामर्थ्य व प्रभावी प्रशासनाचा संदेश मिळतो.
राष्ट्राकल्याणासाठी त्यांचा हा आदर्श सर्वांनी अंगिकारला पाहिजे.महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनीही यावेळी महाराजांवरील आपले विचार व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास मंचचे समन्वयक प्रा. विशाल पारकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रा. अच्च्युत राउत
तसेच महाविद्यालयाच्या शिवप्रतिष्ठान व इतिहास मंचचे विद्यार्थी प्रतिनिधीं व सदस्य यांचेही सहकार्य लाभले.
फोटो: १) छत्रपती शिवाजी महाराजाची पालखी व शिवज्योत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने महाविद्यालयामध्ये आणताना
२) शिवचरित्रावर व्याख्यान देताना प्रा. अरविंद कुलकर्णी, उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी






“सत्यं वद धर्मं चर” - डॉ. सुभाष देव यांचा पदवीधरांना संदेश राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित आंबव येथिल राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ नुकताच संपन्न झाला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या  १७ व्या पदवीधर तुकडीला यावेळी शिक्षणतज्ञ डॉ. सुभाष देव यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्ष सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, सौ. देव आदी मान्यवरांच्या व्यासपीठावरील उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक व बहुसंख्य स्नातक याप्रसंगी  उपस्थित होते
दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने समारंभाला सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाची ही १७ वि स्नातक तुकडी बाहेर पडत असून महाविद्यालयामध्ये साजरा होत असलेला हा पाचवा पदवीदान समारंभ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी अंतिम वर्षाच्या निकालांचे विश्लेषण सादर केले. यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी पदवीधारक विद्यार्थ्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात ज्ञान, कौशल्य, आणि सदवृत्ती याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली.
मुख्य अतिथी व शिक्षणतज्ञ डॉ. सुभाष देव यांनी यानंतर स्नातकांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनि मिळालेल्या पदवीचे महत्व ओळखावे. आजचे उपलब्ध जॉब पारंपारिक स्वरूपाचे राहिले नसून त्यामध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. तसेच त्यामध्ये असणारी जागतिक स्पर्धा व सतत बदलणारे तंत्रज्ञान लक्षात घेता  पदवीधरानी नैपुण्य वाढविणे, अष्टपैलू बनणे, व्यवस्थापकीय ज्ञान वाढविणे, नवीननवीन ज्ञान आत्मसात करणे यासारख्या गोष्टी क्रमप्राप्त झाल्या आहेत. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना पथदर्शी ठरेल अशा सत्यं वद धर्मं चरया संस्कृत सुभाषिताचा उल्लेख करून त्याप्रमाणे प्रमाणे सर्वांचे आचरण असावे असा संदेश दिला.
संस्थेचे अध्यक्ष मा. रवींद्र माने यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आयुष्यातील एक मुख्य टप्पा पार केला आहे मात्र एवढ्यावर समाधानी न राहता त्यांनी मोठी मजल गाठण्याची इच्छा ठेवावी अशी मनोकामना व्यक्त केली.
यानंतर उपस्थित सर्व स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. सोनिया मापुसकर यांनी केले तर प्रा. स्नेहल मांगले यांनी आभार प्रदर्शन केले. महाविद्यालयाच्या सर्व विभागप्रमुखांनी यानंतर विद्यार्थ्यांची विभागवार सभा घेऊन हितगुज केले. रोजगारप्राप्त व पुढील उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनीही यावेळी आपले अनुभव कथन केले. स्नेह्भोजानानंतर समारभाची सांगता झाली