राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एम एम एस विभागाने विद्यार्थ्यांसाठी “उद्योजकता विकास व भागधारक व्यवस्थापन (स्टेकहोल्डर मॅनॅजमेंट)” या विषयावर सेमिनारचे आयोजिन केले होते. यामध्ये अभियांत्रिकी पदवीधर तसेच आय आय एम, अहमदाबाद मधून एम बी ए पदवी प्राप्त व सध्या बंगळूर येथे स्टार्टअप मध्ये कार्यरत असलेले श्री कार्तिकेयन रामस्वामी यांचे उपस्थित विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.
आजच्या जगात कोणताही उद्योग यशस्वी करण्यासाठी त्या उद्योगाच्या संबंधित सर्व घटकांना समान महत्व देणे आवश्यक असते. या घटकांमध्ये ग्राहक, सरकारी यंत्रणा, पुरवठादार, सल्लागार, कर्मचारी इ. समाविष्ट होतात. या सर्वांचा योग्य ताळमेळ घालून व्यवसाय पुढे नेणे महत्वाचे असते. यासाठी व्यावसायिक व वैयक्तिक कौशल्ये कशी वापरावीत याचे विशेष ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे या हेतूने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी या कार्यक्रमाचे महत्व विशद केले. विद्यार्थ्यांनी नुसते नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय हा सुध्दा पर्याय स्वीकारावा असे आवाहन त्यांनी केले. सध्या नोकऱ्यांची उपलब्धता पाहता उद्योग करण्याची मानसिकता आवश्यक असून तरुण वर्गाने हा पर्याय स्वीकारावा असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर विषय तज्ञ श्री कार्तिकेयन यांनी कोणताही व्यवसाय चालू करण्यासाठी असणारी मार्गदर्शक तत्वे व नियम यावर सविस्तर मार्गदर्शन यांनी केले. व्यवसाय चालू केल्यानंतर येणाऱ्या अडचणी व त्याचा सामना करण्यासाठी असणारी मानसिकता याचा सखोल विचार त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. यासाठी त्यांनी काही उपक्रमांचा आधार घेतला. नवीन व्यवसाय वृध्धिंगत करण्यासाठी कोणत्या घटकांना महत्व दिले पाहिजे, त्यांना कोणत्या प्रसंगी किती महत्व दिले पाहिजे, त्यांच्या अपेक्षांचा एक समान व्यासपीठावर कसा आढावा घेतला पाहिजे याची उद्बोधक चर्चा या प्रसंगी झाली. आपल्या व्याख्यानाच्या शेवटी ते म्हणाले कि, देशाची आर्थिक व सामाजिक प्रगती उद्योग वाढीवर अवलंबून असते. विकसित देशात उद्योजकांची संख्या अविकसित देशांच्या तुलनेत खुप अधिक आहे. तसेच आपला देश हा एक विकसित राष्ट्र होण्यासाठी अग्रेसर असून यासाठी युवा पिढीने उद्योजाग्तेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
या सेमिनारच्या माध्यमातून उपस्थित प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना व्यावसायाभिमुख शिक्षणाचा अनुभव मिळाला. तसेच या सर्व नियोजन पद्धतीमध्ये व्यवस्थापन कौशल्ये कशी महत्वाची आहेत व त्यांचा समर्पक वापर कसा करावा याचेही ज्ञान झाले.
या कार्यशाळेचे नियोजन विभागप्रमुख प्रा. मोहन गोसावी यांनी केले. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष व माजी मंत्री मा. श्री रवींद्र माने, संचालक मा. जान्हवी माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
फोटो: कार्यक्रम प्रसंगी विशेष अतिथी व तज्ञ मार्गदर्शक श्री रामसामी कार्तिकेयन सहभागी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना.