केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय अंतर्गत नुकताच रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. याचा एक भाग म्हणून प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ऑटोमोबाईल विभागातर्फे रस्ता सुरक्षा जागृती कार्यक्रम घेण्यात आला. प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरीतील अधिका-यानी विद्यार्थ्यांना याप्रसंगी बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल विभागाच्या “ऑटोट्रेंड” या विद्यार्थी संघटनेतर्फे दरवर्षी वाहतूक व परिवहन क्षेत्राशी निगडीत विशेष कार्यक्रम राबविले जातात. संघटनेच्या विद्यार्थ्यानी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. महेश भागवत, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संतोष साळुंखे व सत्यजित खाडे, ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. अनिरुद्ध जोशी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व महाविद्यालयातील विभागांची ओळख करून दिली. त्यांनी प्रास्ताविकात सुरक्षित प्रवास महत्वाचा असून त्यासाठी या विभागातील विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा वापर करून नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमावर आधारित विविध प्रकारची पोस्टर बनवून प्रदर्शित केली. वैष्णव देवरुखकर याने रस्ता सुरक्षेवर सादरीकरण केले.
यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संतोष साळुंखे व सत्यजित खाडे यांनी उपस्थिताना सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये हा साप्ताह दरवर्षी साजरा करण्यामागचा उद्देश प्रथम स्पष्ट केला. त्यानंतर प्रवासामध्ये गाडीचा वेग किती असावा, वेगाची पातळी ओलांडल्यास भरावा लागणारा दंड, वाहतुकीचे विविध नियम, रस्त्यावरील माहितीदर्शक चिन्हे, वाहन चालविताना जवळ बाळगण्याची कागदपत्रे यासंबधी माहिती दिली त्याचबरोबर आपल्याबरोबरच रस्त्यावरून जाणा-या इतरांचीही काळजी घेण्याचे सर्वाना आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा. स्वप्नील राऊळ, श्रवण करकरे, “ऑटोट्रेंड” या विद्यार्थी संघटनेचे अन्य विद्यार्थी प्रतिनिधी यांनी मेहनत घेतली. ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. अनिरुद्ध जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.
फोटो:
No comments:
Post a Comment