Friday, March 3, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष शिक्षक पालक सभा संपन्न !!




फोटो:- शिक्षक-पालक सभेप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.महेश भागवत तसेच संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने,सौ.नेहाजी माने,विभागप्रमुख प्रा.दीपक सातपुते, पालक प्रतिनिधी श्री.वासुदेव अणेराव व उपस्थित पालक
  देवरुख येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय आंबव येथे शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली.सदर सभेसाठी संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने,सौ.नेहाजी माने, प्राचार्य डॉ.महेश भागवत,विभागप्रमुख प्रा.दीपक सातपुते, पालक प्रतिनिधी श्री.वासुदेव अणेराव,प्राध्यापकवृंद तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
  सभेची सुरुवात परीक्षाविभागप्रमुख श्री.विश्वनाथ जोशी यांच्या प्रेझेन्टेशनने झाली.त्यांनी मुंबई विद्यापीठाची बदललेली गुणांकन पद्धती(CBGS) विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर सभेचे समन्वयक श्री.सातपुते यांनी सदर सभेच्या आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. प्राचार्य डॉ. भागवत यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सदर केला. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली.तसेच संस्थेमार्फत प्रथम व शेवटच्या वर्षातील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेने सुरु केलेल्या विशेष पारितोषिकांची घोषणा केली.
  यावेळी आयोजित चर्चासत्रात सर्व पालकांनी उत्स्फुर्त संवाद साधला. पालकांनी महाविद्यालयाची शिक्षणपद्धती तसेच उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे नमूद केले. पालकांनी  विविध सूचना नोंदविल्या तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याचे अनुमोदनही दिले.
  संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी मानेसाहेबांनी अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सोयी(क्रीडा,ग्रंथालय,खानावळी,कमी मूल्यात जेवण)तसेच रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती दिली.तसेच शिक्षकांसोबत पालकांची त्यांच्या पाल्याप्रती जबाबदारीची जाणीवही करून दिली. महाविद्यालयातर्फे आत्तापर्यंत सुमारे ६५ विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण प्रदान केल्याचेही त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी देश तसेच विदेशातही कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.शेवटी पालकांनी पाल्यांच्या मानसिक तसेच शारीरिक बदलाकडे विशेष लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
  श्री.वासुदेव अणेराव यांनी पालक प्रतिनिधी म्हणून नेमणूक केल्याबद्दल तसेच बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले.तसेच परीक्षा मुल्यांकन पद्धत समजावून सांगितल्याबद्दल श्री.जोशी सरांचेही आभार मानले. महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.प्रा.शिल्पा फलटणे यांनी सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे बहुमोल सहकार्य लाभले.


 








No comments:

Post a Comment